Friday, December 20, 2019

एका अवलिया "लमाणाचा" रंगभूमीला शेवटचा निरोप...! 🛌

                                                                                                                          (भाग- ३)👇
                                       'लमाण' मध्ये लागूंनी जवळजवळ सर्व नाटकांच्या अत्यंत मौलिक आणि उद्बोधक अशा हकीकती सांगितल्या आहेत...त्यातील काही थोड्यांचाच उल्लेख येथे करणे सोयीचे आहे...यात विजय तेंडुलकरांबरोबरच मोहन राकेश , गिरीश कर्नाड , सूगो बेट्टी यांच्यासारख्या दिग्गजांच्या अनुवादित नाटकांचा समावेश तर आहेच , पण अनेक नव्या दमाच्या नाटककारांचाही...यात वि. वा. शिरवाडकरांच्या 'नटसम्राट'ने डॉक्टरांचे नाव अजरामर केले तर गो. पु. देशपांड्यांच्या 'उध्वस्त धर्मशाळा'ने त्यांच्या रंगमंचावरील कार्याला संपूर्ण नवे वळण दिले...
                        वसंत कानेटकर आणि वि. वा. शिरवाडकर हे दोघेही नाशिककर नाटककार लागूंना जवळचे...त्या दोघांच्याही नाटकांतल्या आव्हानदायी चरित्रभूमिका त्यांनी समर्थपणे हाताळल्या...गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे यांच्यापासून तो प्र. ल. मयेकर , प्रेमानंद गज्वी आणि श्याम मनोहर यांच्यासारख्या आजकालच्या नाटककारांच्या 'प्रायोगिक' कृतीही त्यांनी उत्साहाने हाताळल्या. मोहन तोंडवळकर , सुधीर भट आणि मोहन वाघ यांच्यापासून तो गोवा हिंदू असोसिएशन आणि इंडियन नॅशनल थिएटरसारख्या संस्थांतही ते निष्ठेने वावरले...या सगळ्यांमध्ये उठून दिसतो तो थिएटर युनिटचा सत्यदेव दुबे...त्यांच्या प्रागतिक संस्थेसाठी डॉक्टरांनी तेंडुलकरांचे 'गिधाडे' हे खळबळजनक नाटक दिग्दर्शित केले आणि त्यात स्वत: एक मध्यवर्ती भूमिकाही केली...
                      महाराष्ट्र शासनाची रंगमंचीय सेन्सॉरशिपची यंत्रणा आणि 'गिधाडे' यांच्यामधील झगड्याची 'लमाण'मधली हकीकत अपेक्षेप्रमाणे रोमहर्षक आहे...(यात 'गिधाडे'चे इंग्रजी भाषांतर पुढे अलेक पदमसींनी रंगमंचावर आणले तेव्हा सेन्सॉरने त्याच्याकडे ढुंकूनही बघितले नाही!) 'गिधाडे'बद्दल लागूंनी एखाद्या अव्वल दर्जाच्या समीक्षकासारखे लिहिलेले आहे...आपला संबंध आलेल्या बहुतेक सर्व नाटकांबद्दल लागू जाणकारीने लिहितात...यात 'उद्धवस्त धर्मशाळा'प्रमाणेच त्यांनी स्वत: अनुवादित करुन प्रायोगिलेल्या ज्या आनुईच्या 'ऑन्टिगनी'चाही उल्लेख करायला पाहिजे...'सामना' हा रामदास फुटाणे निर्मित व जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट ज्या दिवशी बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रमहोत्सवासाठी गेला , त्याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी पुकारली...आणीबाणीवर लागूंनी केलेली टीकाटिप्पणी त्यांची राजकारणाची समज किती प्रगाढ आहे , हे स्पष्ट करते...'उध्वस्त धर्मशाळा'ने हे सिद्ध केलेच होते...पुढे 'ऑन्टिगनी', गो. पुं.चे 'चाणक्य' यांच्या निवडीतही हेच स्पष्ट केले...
                   याच समजाप्रमाणे डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी किती पक्की आहे , हे 'सामाजिक कृतज्ञता निधी'साठी त्यांनी आचार्य अत्र्यांचे 'लग्नाची बेडी' हे नाटक घेऊन महाराष्ट्रभर जो अपूर्व असा दौरा केला , त्यावरुन दिसून येते...

'लमाण' हे त्या लेखकाइतकेच श्रेष्ठ आणि अद्वितीय आहे...!